Manache Shlok – Part 1

Manache Shlok - Part 1

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥


The first 1 to 52 shlokas of Manache Shlok, a collection of verses by the 17th-century Marathi saint and poet Shree Samarth Ramdas Swami, are presented in Manache Shlok – Part 1.

Manache Shlok

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥

नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।

गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥

जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।

जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

पुढे वैखरी राम आधी वदावा॥

सदाचार हा थोर सांडूं नये तो।

जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥

मना धर्मता नीति सोडूं नको हो।

मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥

मना कल्पना ते नको वीषयांची।

विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।

नको रे मना काम नाना विकारी॥

नको रे मना लोभ हा अंगिकारू।

नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।

मना बोलणे नीच सोशीत जावें॥

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।

मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।

मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।

न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥९॥

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।

दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥

देहेदु:ख ते सूख मानीत जावे।

विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥१०॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।

विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।

तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।

मना सर्वथा शोक चिंता नको रे॥

विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।

विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥

मना सांग पां रावणा काय जाले।

अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं।

बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।

परी शेवटीं काळमूखीं निमाला॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।

कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।

जितां बोलती सर्वही जीव मी मी॥

चिरंजीव हे सर्वही मानिताती।

अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।

अकस्मात तोही पुढे जात आहे॥

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।

अकस्मात होणार होऊनि जाते॥

घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।

मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥

मना राघवेंवीण आशा नको रे।

मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥

जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।

तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।

मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥

मना सत्य ते सत्य वाचे वदावे।

मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी।

नको रे मना यातना तेचि मोठी॥

निरोधें पचे कोंडिले गर्भवासी।

अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥

मना वासना चूकवीं येरझारा।

मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥

मना यातना थोर हे गर्भवासीं।

मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥

मना सज्जना हीत माझें करावें।

रघुनायका दृढ चित्ती धरावें॥

महाराज तो स्वामि वायुसुताचा।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।

जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥

घडिने घडी काळ आयुष्य नेतो।

देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

रघुनायकावीण वांया शिणावे।

जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे।

अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।

पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥

सुखाची घडी लोटतां सूख आहे।

पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।

परी शेवटीं काळ घेउन गेला॥

करीं रे मना भक्ति या राघवाची।

पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी।

धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी।

पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥

मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे।

वळें भक्तरीपूशिरी कांबि वाजे॥

पुरी वाहिली सर्व जेणे विमानीं।

नुपेक्षी कदा रामदासाभिमानी॥२९॥

समर्थाचिया सेचका वक्र पाहे।

असा सर्व भुमंडळी कोण आहे॥

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३०॥

महासंकटी सोडिले देव जेणें।

प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।

पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥

जया वर्णितां शीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला ।

शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥

चिरंजीव केले जनी दास दोन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥

उपेक्षी कदा रामरुपी असेना।

जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥

शिरी भार वाहेन बोले पुराणीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा।

वसे हो तया अंतरी देव तैसा॥

अनन्यास रक्षीतसे चापपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे।

कृपाळुपणे अल्प धारीष्ट पाहे॥

सुखानंद आनंद कैवल्यदानी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।

उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥

हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।

रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे।

जयाचेनि योगें समाधान बाणे॥

तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।

अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥

विविकें कुडी कल्पना पालटिजे।

मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥४०॥

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।

शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥

विचारें बरें अंतरा बोधवीजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४१॥

बहुतांपरी हेंचि आतां धरावें।

रघूनायका आपुलेसे करावें॥

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥४२॥

मना सज्जना एक जीवीं धरावें।

जनी आपुलें हीत तूवां करावें॥

रघूनायकावीण बोलो नको हो।

सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।

कथा आदरे राघवाची करावी॥

नसें राम ते धाम सोडूनि द्यावे।

सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥

जयाचेनि संगे समाधान भंगे।

अहंता अकस्मात येऊनि लागे॥

तये संगतीची जनीं कोण गोडी।

जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥

मना जे घडी राघवेवीण गेली।

जनीं आपुली ते तुवां हानि केली॥

रघूनायकावीण तो शीण आहे।

जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥४६॥

मनीं लोचनीं श्रीहरी तोचि पाहे।

जनीं जाणतां मुक्त होऊनि राहे॥

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४७॥

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।

सदा रामनामें वदे नित्य साचा॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४८॥

सदा बोलण्यासारिखे चालताहे।

अनेकीं सदा एक देवासि पाहे॥

सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥

नसे अंतरी काम नानाविकारी।

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥

निवाला मनीं लेश नाही तमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।

प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥

सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५१॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।

न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥

करी सुखसंवाद जो उगमाचा।

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

Manache Shlok

मनाचे श्लोक – Manache Shlok Hardcover Book

‘मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत ‘मनाचे श्लोक’ सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात. Manache Shlok

Manache Shlok – Part 2

Manache Shlok – Part 3

Manache Shlok – Part 4

Explore a world of literary wonders at www.lovetoread.online – where each visit promises a new adventure in the realm of captivating content. Manache Shlok Manache Shlok Manache Shlok Manache Shlok

3 thoughts on “Manache Shlok – Part 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *